माझं जग...माझं आभाळ

माझं जग...माझं आभाळ
थोडंसं वास्तव परिस्थिती पासून दूर जाऊन, कधी एक-एकट तर कधी कोणी सोबत घेऊन ...

Sunday, December 26, 2010

DeaR


अजूनही तुझा आवाज कानात घुमतोय बघ...
'बाकी सर्व खुशाल...तुझ्यासारखं...'
DeaR आलं यातच सारं, नाही का?
असो...
मला एक सांग कशी दिसत असशील गं आता...
खात्री आहे....तशीच असशील... 'माझी वाली'
.....निरागस, कावरी-बावरी....
कृत्रिम रंगाचा स्पर्श.... त्याची तुला कधी गरजच भासली नव्हती .....
आणि आताही ......हो खात्री आहे शंभर टक्के...
समोरच्याच्या आत्म्याला भिडणारी तुझी नजर ...अजूनही काळजात जपून ठेवलीय....
बराच काळ लोटून गेलाय असं वाटतं....नाही का गं....
कित्येकदा तुझ्या दारातून परतलोय....सातासमुद्रापार असलेल्या...
रोज दिवसभरात माहित नाही किती चकरा होतात....
मी मोजत नाही गं....पूर्वीसारखे हिशेब जमत नाहीत हल्ली....
तू फक्त एकदा दिसलीस कि होईल सर्व वसूल.......फक्त एकदाच
तुला आज पण असंच वाटतं का गं झालं ते सर्व माझ्यामुळे?
त्या दिवशी तुझ्या बोलण्यातून जाणवत होतं ते मला...
वाटलंच.....कधी भेटलेलीस? एवढा विचार नको करूस....
आता भेटते आहेस तशी गं...
तू भेटतच असतेस मला माझ्या विचारांमधून, स्वप्नांमधून....तर असो 
रागात पण गोड दिसतेस, आजपण...  
अगं हो हो DeaR .....किती त्रागा करून घेशील....
चुकलंच माझं...मोजायला हवं होतं.... तुझ्या-माझ्यातलं अंतर, ते अंतर कापण्यासाठीचा वेळ, मारलेल्या चकरा...
तुझ्या आठवणी, रात्रींचे दिवस, हरवलेले क्षण, गुदमरलेले श्वास, कोंडलेले शब्द, नरक-यातना.....अजूनही बरंच काही...
जमलंच नाही बघ अगणित कसं मोजायचं ते....
हिशेबांना जरा डोके लावले असते तर .....
पण छ्या .....प्रेमात डोकं कमीच लावलं......असं तुझं म्हणणं....
वेडाबाई ....मनात तुझ्या कधी डोकावलो नाही मी......?
फक्त मान उंचावून तुला बघत राहिलो....
अगदी खरं सांगतोय.....आज पण तिथूनच बोलतोय.....तुझ्या मनासारखी प्रशस्त जागा कुठेच नाही....
सात समुद्रापार माझा आवाज पोहोचतोयना .....
आणि ते सात असू देत कि सात हजार, फरक पडेल का???
आणि जखमांचे काय घेऊन बसलीस DeaR?
जखमा होतात त्या शरीराला, तुटलेल्या भागाचे काय ..... निर्जीवच
केला ना माझा जीव दुसऱ्याच्या स्वाधीन?
आपल्यामध्ये समुद्र आणले नाही गं DeaR मी .....ते यायचेच होते......
विरहाचे म्हणशील तर.... शरीरापुरते .......समुद्र दोन शरीरांमध्ये आलेत.....
आजही मी पाहतोय गं तुला....शेवटचे कोणते ठरेल माहीत नाही......
जाणून घ्यायचेही नाही....
- फक्त तुझाच 
शेवटच्या श्वासापर्यंत...त्यानंतरही...

Monday, December 20, 2010

प्रथम तुज पाहता

ट्युशनवरुन घरी परतल्यावर आम्ही त्यादिवशी रोजच्या सारखेच बाहेर असंच इकडचं-तिकडचं बोलत उभे होतो. मी, चितु उर्फ चित्रा आणि स्वाती. बोलता बोलता सहज माझे लक्ष थोडे बाजुला गेले. आणि काय सांगु राव, मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. चक्क ’तो’ मला दिसला. पण इकडे कसा काय? कोणाकडे आला असेल? जाउ दे ना, आपल्याला काय करायचय? ते important नव्हतं माझ्यासाठी. तो दिसला हेच खुप होतं.
Oh my God! काय करु नी काय नको अशी अवस्था झालेली माझी तर. खरंच तो कधी असा अचानक समोर येईल असं ध्यानी-मनी पण वाटलं नव्हतं. आपसुकच छोटीशी किंचाळी वगैरे निघाली तोंडातुन. दोन्ही हात आपोआप तोंडावर धरले गेले. डोळे विस्फारुन मी त्यालाच बघत होते. आणि तो माझ्याकडे बघत होता. एकंदर
माझे एक्स्प्रेशन पाहुन त्या दोघींना कळेना मध्येच मला काय चावलं ते. पण जेव्हा त्या दोघींना ’तो’ दिसला, तेव्हा त्या दोघींना पण खुप आश्चर्य वाटले. तो बाजुने निघुन सुद्धा गेला. आणि आम्ही अगदी सुदुर-बुदुर झाल्यागत एकमेकींच्या तोंडाकडे पहात राहिलो. माझ्या मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. असे काहीतरी शेकडो कारंजी वगैरे काय ते म्हणतात ना तसंच काहीशी मनाची अवस्थता झालेली.  इतक्यात चितु ओरडली,"अगं चला लवकर बघुया कुठे जातो ते." त्यावर मी भानावर आले. मग short-cutने  धावतच जाऊन त्याला गाठायचा प्रयत्न केला. पण छे! काही उपयोग झाला नाही. ’तो’ कुठे गायब झाला. काहीच
थांगपत्ता लागला नाही. ’bad-luck’. असो.

रात्री बराच वेळ झोपच येत नव्हती. सतत त्याचा चेहरा डोळ्यासमोर, असंख्य प्रश्न- कुठे रहात असेल तो? आज आपल्या इथे कसा काय दिसला? इथेच कुठे रहात असेल तर? परत उद्या दिसेल का? त्याने मला ओळखले असेल का? छे रोजच्या एवढ्या गिर्हाईकांमधुन मला कसा काय लक्षात ठेवेल तो? मग जास्तच अस्वस्थ
वाटायला लागले. नाहीच दिसला असता तर बरे झाले असते. जीव चुरचुरायला लागलेला. बघु उद्या जमलं तर दुकानावर चक्कर टाकु, अशी मनाची समजुत काढली.

त्याची थोडक्यात ओळख सांगायची म्हणजे ’तो’ थेट गांगुली सारखा दिसतो. बस एवढंच.
आता गांगुली कुठे आला मध्येच? तर त्याचे असे झाले, मला गांगुली भयंकर आवडायचा. तो केवळ आवडायचा म्हणुन तो कसा छान खेळतो, असं वकीलपत्र मी स्विकारलेलं. कधीतरी(?) त्याची खेळी जरा(?) वाईट (म्हणजे अगदी नाही) झाली की Press-Conferenceला मलाच तोंड द्यावे लागणार आहे अशा प्रकारचे टेंशन यायचे मला. तर असो. गांगुली आता महत्त्वाचा नाही. सांगायचा मुद्दा असा की एकदा मला आमच्या स्वातीबाईंनी त्याच्या बद्दल सांगितले की, ’आपल्या मार्केट मध्ये जे सुरुवातीचं गिफ्ट-शोप चे दुकान आहे ना ’जस्ट लव्ह’.
तिथे एक मुलगा असतो. तो थेट आपल्या(?) गांगुलीची copy आहे.’ वगैरे.
सुरुवातीला मी लक्ष नाही दिले. म्हटलं माझा गांगुली कुठे? आणि तो कोण? जाउ दे ना. पण असं तिला स्पष्ट कसं सांगयचं? म्हणुन तुर्तास, हो म्हटलं बाई असेल गांगुली सारखा. पण तिने ’एकदा तरी बघ त्याला’ म्हणुन मला रिक्वेस्ट केली. आता ’मला आवडणारा गांगुली’, तिच्या मते गांगुलीसारखा दिसणारा ’तो’ आणि ’ती’ या तिघांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नव्हता. तिचा मान ठेवायला म्हणुन आम्ही एके दिवशी तिघी मिळुन गेलो त्याच्या दुकानात. आणि पहाते तो काय? साक्षात ’गांगुली’ माझ्यासमोर उभा आहे की काय असंच काही क्षण मला वाटत होते. नलाला बघुन दमयंतीची काय अवस्था झाली असेल त्याचे वर्णन मी रिपीट नाही करत. पण सेम टु सेम माझी अवस्था. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास होत नव्हता. इतकी समानता कशी काय असु शकते? निव्वळ असंभवच. खरंच गांगुली तर नाही ना, असा फालतु प्रश्न पण डोकावुन गेला मनात. पण तसे वाटणे सहाजिकच होते, स्वभाविकच होते. माझ्या जागी इतर कोणी असते, तर त्याला सुद्धा असा फालतु प्रश्न पडु शकला असता.

अजुनही नंतर ३-४ वेळा तरी फक्त ग्रिटींग कार्ड घ्यायच्या बहाण्याने गेलो असु. पण मग तिथल्या लोकांच्या नजरेत यायला लागलेलं. त्यानंतर मात्र मनाला आवर घालावा लागला. नाहीतरी पुढचं वर्ष बोर्डाचं होतं. ते जास्त महत्त्वाचं होतं. ’गांगुली’ chapter closed.

त्यादिवशी अनपेक्षितपणे त्याच्या समोर येण्यानं closed chapter अधिक क्लोज-अप झाला. जेवढा दूर जायचा प्रयत्न करत होती, तितकीच अधिक गुंतत चालल्या सारखं वाटायला लागलेलं . त्याला पुन्हा पुन्हा पहावेसे वाटत होते. तो पुन्हा दिसावासा वाटत होता. बरे, पहाण्यापर्यंत ठिक आहे. पुढे काय? एक विचित्र ओढाताण चाललेली मनातल्या मनात.
एक मन विचारत होतं ’प्रेमात-बिमात पडली नाहीस ना?’
एक मन टपली मारत होतं, ’अरे अपुन इस टाईपकी नही हैं। हे प्रेम-बिम आपल्याला नाही जमणार. ते रोमंटिक-बिमन्टिक व्हायला आपल्याला कुठं जमतं? टेलीव्हिजनला खवय्ये-प्रोग्रम आवडीने बघतात काहीक जण. तसाच प्रकार. ते पदार्थ करुन पहायचेच असे कुठे लिहलंय का? मग त्याला फक्त बघायला आपलं काय
जातं?’
(विशेष नोंद : दोन्ही मने अद्रुश्यपणेच संवाद साधत होती. मनाच्या रुपात स्वतःचे डबल रोल - ट्रिपल रोल नाही दिसलेत अजुन पर्यंत.)

टपलीवाल्या मनाचं ऐकायचं ठरलं. परत दिसला तर ठिक, स्वतःहुन नाही जायचं बघायला. त्याच्या दुसर्‍या दिवशी तो पुन्हा दिसतो का, म्हणुन फक्त चांस घेऊ असं म्हणत दोघींना मी थांबवलं. दर्शन नाही मिळाले. आम्ही तिघी ट्युशनवरुन परतल्यावर मुद्दामहुन घराबाहेर कारण नसताना घुटमळायला लागलो . ३ दिवस गेले, ४ गेले, ५-६, ७... छ्या! तो परत दिसला नाही. ’छोड यार!’ करत आम्ही होप्स काढुन टाकल्या. त्या दोघींना फरक पडायचा प्रश्नच नव्हता. आणि मी पण पहिल्यावाल्या मनाला ’हुर्र्र्र्र्र्र्र्र्र’ करुन उडवत होते. उगीच
बाहेर ताटकळत टाईमपास करणे बंद झाले.

त्यानंतर असंच एकदा आम्हाला ट्युशनवरुन सुटायला उशीर झालेला. स्थळ : पुन्हा तेच.
"ए तो बघ, तो बघ लवकर." चितु अचानक ओरडलीच. आणि पुन्हा एकदा आनंदाच्या उकळ्या and शेकडो कारंजी वगैरे.
"मुर्ख, हळु बोलता नाही येत का?" एक टपलीत दिली मी तिच्या. ’त्यात काय एवढ?’ च्या आविर्भावात दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण खरंच मला आनंद लपवायला नव्हतं जमत.

ह्या ना त्या कारणाने मी त्या दोघींना थांबवायची. बहुदा त्या दोघींना पण हे कळत होतं. मग आम्ही नियमितपणे थांबायला लागलो . बहुतेक वेळा तो दिसायचा. अर्थात त्याच्याही हे लक्षात येत होते की आम्ही त्याच्याचसाठी थांबतो असे. तो सुद्धा आम्हाला rather मला बघत बघतच जायचा. एक नविन सिलसिलाच
सुरु झालेला.

त्याची वाट बघायला खुप आवडायचे. येर-झार्‍या घालून पाय दमले की कट्ट्यावर बसुन माना दुखेपर्यंत वळुन वळुन वाटेकडे बघायचो. कधी त्याला यायला उशीर होतो आहे असे वाटले की नकळत तोंडातुन निघायचे,
"अरे चंद्र अजुन का उगवत नाही."
"थोडा धीरज ठेव बालिके. येतच असेल तुझा चंद्र. अरे क्या बात हैं, तो बघ आलाच."
तो येताना दिसला की अचानक हजारो कळ्या एकदम फ़ुलल्यासारखे वाटायचे. त्या काही क्षणांचे वेध दिवसभर असायचे.

एकदा तर चक्क तो बाजुने जाताना आम्ही गाणे-बिणेपण म्हटलेलं. कोणतं गाणं होतं बरे? हा सलमान-करिष्माचं ’धीरे-धीरे चलना’ आणि त्या गाण्याच्या मुखड्यातला शेवटचा ’पलट’ शब्द उच्चारल्यानंतर चक्क त्याने पलटुन पाहिलेले आम्हाला आणि काय गोड हसलेला म्हणून सांगू. मी एकदम खल्लासच. काय पण सीन होता, वाह वा!

त्याला बघायची इतकी सवय झालेली की तो नाही दिसला तर दिवस फुकट गेल्यासारखे वाटायचे. बस त्याची एक झलक दिसावी म्हणुन वेड लागलेलं मला. कोण-कुठला तो. त्याचं नाव सुद्धा माहिती नव्हतं मला. त्याच्यासाठी इतकं का मी पागल-बिगल व्हावं. जे चाललंय ते चुक की बरोबर? कोण ठरवणार हे? मी तर स्वतःच्या मनाला आवर घालु शकत होते. पण तो गुंतत गेला तर? हे कुठे तरी थांबवायला हवे होते. स्वतःहुन त्याला न-पहाणे मला अवघड वाटायला लागलेले.
खर्‍या गांगुलीचे पोस्टर्स एव्हाना धुळ खायला लागलेली. मला गांगुली आवडायचा हे मी साफ त्याला विसरुन गेलेली.

मग काय झाले कोणास ठाऊक, तो पुढे पुढे येईनासा झाला. न राहवुन दुकानावर चक्कर टाकुन पाहिली. तो तिथे पण नाही दिसला. कदाचित गावी वगैरे गेला असेल असे वाटले. पण असा किती दिवस जाईल? महिना? २ महिने? ४ -६? बघता बघता एक वर्ष होऊन गेले.

तो परत कधीच दिसला नाही आणि आता परत कधी दिसेल माहित नाही.
माझ्या बद्दलच्या त्याच्या भावना मला माहित नाही.
आता तो कुठे असेल? कसा असेल? काय करत असेल?
मला त्याची आताही आठवण येतेय. त्यालासुद्धा माझी आठवण येत असेल का?
सारंच अनुत्तरीत...

Monday, December 13, 2010

माझा सोबती टुटु

टुटु
टुटुमध्ये आम्ही सर्वच जण कसे गुंतत गेलो कळालेच नाही. टुटुमुळे मी मात्र या मांजर-परिवाराच्या खुप जवळ गेली. मांजरांबद्दल वाटणारी भीती, नुसती भीतीच नाही पण माहिती नाही का मला मांजराला हात लावायला पण घाण वाटायची. एकंदर मांजरांबद्दल जे काही मनीचे (माझ्या मनाचे) भाव (वाईट) होते ते जसजसा टुटु मोठा होत गेला तसतसे कमी होत गेले. खरं सांगायचे तर तो मोठापण कधी झाला ते पण आम्हाला कळालेच नाही असा ’Typical’ dialogue नाही म्हणायचा मला. पण अचानक एके दिवशी कळाले. टुटु वर्ष-दोन वर्षाचा असेल त्यावेळेला आम्ही गावाला गेलेलो. घरातले सर्वच जण (झाडुण) गेलेलो. गावी जायचं ठरल्यावर बाबांना भरपुर म्हणजे भरपुरच टेंशन आलेले त्याचे. त्यांना खरं तर दोन गोष्टींचे टेंशन आलेले. टुटुबद्दल तर होतेच. आणि दुसरे म्हणजे त्यांची फ़ुलझाडं, त्यांना पाणी कोण घालणार? घुशी मुळं पोखरुण तर नाही ना टाकणार? वसाहतीमधली टारगट पोरं-टोरं काही खोड्यातर नाही ना करणार....वगैरे वगैरे....
तसे पहायला गेलो तर दुसरे टेंशन पहिले होते, कारण फ़ुलझाडं टुटु यायच्या आधीपासुनची होती. तर असो.
टुटुचे  टेन्शन जरा जास्त महत्त्वाचे होते. कारणे बरीच होती. त्याला बाहेर रहायची सवय अजिबातच नव्हती. शिवाय त्याचे खाणे-पिणे (चवीचेच) सर्व घरातच. त्यात तो फ़ारच नाजुक. ’बोक्या’ जातीला काळीमा फ़ासणार्‍या अशा या टुटुच्या जीवाचे ’वैरी’ बरेच होते. जसे की कुत्रे, इतर बोके (जळणारे), काही धष्टपुष्ट घुशी वगैरे वगैरे. यासर्व गोष्टींमुळे माझ्यापण जीवाला घोर लागुन राहिलेला. आणि मुख्य म्हणजे प्रश्न २-४ दिवसांचा असता तर वेगळी गोष्ट होती. आम्ही १५ दिवसांसाठी जाणार होतो. पर्यायही नव्हता आमच्याकडे काही. सोबत घेऊन जायला टुटु कुत्र्यासारखा समजुतदारही नव्हता. मुळात मांजर या प्राण्याला फ़क्त त्यांच्या गरजेपुरतीच अक्कल दिली गेली असली पाहिजे. आजतायगत मी शिकाऊ मांजर पाहिलेले किंवा ऐकलेले नाही. शिकाऊ वरुन आठवलं. बाबांना टुटुला ट्रेनिंग-स्कूल मध्ये टाकायचे होते. माहिमला आहे असे ट्रेनिंग-स्कूल, त्यांनी माहिती काढलेली. मग माझ्या डोळ्यासमोर चित्र यायचे की टुटु पाठीला school-bag लावुन आणि गळ्यात water-bottle घालून बाबांबरोबर शाळेत चाललाय, तो वर्गात बसलाय आणि बाई काय सांगताहेत ते न ऐकता त्याचे आपले म्याव-म्याव ओरडणे चालू आहे वगैरे.

या प्राण्याबद्दल आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे, देवादिकांमध्ये त्याला नसलेले स्थान. कुठल्याही देवाचे वाहन म्हणुन त्याला निदान साधं ’Call letter’ आलेलं किंवा अमुक-अमुक देवाने मग मार्जार अवतारात त्याचा वध केला याचा कुठेच उल्लेख ऐकिवात नाही. एवढेच कशाला अमुक-अमुक देव मांजर रुपाने ते सर्व पहात होते, असे वाक्य औषधाला पण सापडणार नाही. मांजर-हत्येनंतर काहीतरी काशीला जावे लागते म्हणतात, हा अपवाद सोडला तर ह्या प्राण्याचा पुराणात विशेष उल्लेख नाही.
अजुनही काही प्राणी आहेत जे देवादिकांच्या यादीत यायला वैटींग-लिस्ट मध्ये आहेत. झालंच तर ससा, झेब्रा, जिराफ़, कांगारु इ. (चुक-भुल माफ़ असावी)
प. पू. रामसे (मला हेच नाव माहिती आहे) यांसारख्यांच्या कृपेने, काळी मांजर / बोका ही/हा भुता-खेतांची / चा प्रचार-प्रमुख असायला कोणाचीच हरकत नसावी. खुपच अवांतर होते आहे असे वाटतेय. असो.

तर आम्ही काही टुटुला घेऊन जाणार नव्हतो. त्याच्यासाठी खिडकीचे एक तावदाण उघडे ठेवायचे का? असा विचार चाललेलाच पण त्यात बर्‍याच अडचणी होत्या.  समजा जर वरीलपैकी वैर्‍यांच्या यादीतला एखादा प्राणी किंवा कळप त्याच्या मागे लागले आणि तो सवयीप्रमाणे स्व-संरक्षणासाठी खिडकीमधुन घरात लपायला आला. आणि बाकीची गुंड-मंडळी पण त्याच्या मागोमाग घरात घुसले तर घराची नासधुस करतील तो वेगळा भाग पण त्याच्याच जीवाला जास्त धोका होता. दरवेळेला त्याची मदतीसाठी हाक आली आमच्यापैकी कोणी धाव घेत असु. पण अशावेळेला काय करेल मग बिच्चारा? मग शेवटी ठरले की त्याला बाहेरच राहु द्यायचे. निदान अशा प्रसंगाला धावायला त्याला रान मोकळे मिळेल.

गावी तशी त्याची काळजी लागुन राहिलेलीच होती. पण एका गोष्टीमुळे जरा इकडचं लक्ष कमी झालं. गावच्या घरात एका मांजरीची नुकतीच जन्मलेली पिल्लं आलेली होती. एक थोडे राखाडी रंगाचे होते आणि एक पांढरट सोनेरी होते. दोघेही छान होते इल्लु-पिल्लुशे. दोघांच्या लीला पाहुन, हि लोकं टुटुचसारखं करताहेत असेच वाटत होते. टुटुची उणीव त्यांनी भरुन काढली.

जेव्हा आम्ही गावावरुन परत आलो. तेव्हा घराजवळ आल्या आल्या टुटु इकडे-तिकडे फ़िरत असताना दिसला. इतके दिवस बाहेर राहुन त्याला वाईट संगत तर नाही ना लागली. भीती वाटुन गेली.
बराच वेळ घरात तो आला नाही. छ्या! बोका हाताबाहेर गेला वाटते, मनात पाल चुकचुकली. पण थोड्याच वेळात तो आला. आम्हाला अचानक भुत दिसल्या सारखं आम्ही त्याला बघतच राहिलो. हे काय म्हटलं? एवढा प्रचंड? हा नक्की टुटुच आहे ना? बापरे एवढा मोठा का दिसतोय? आणि केवळ पंधरा दिवसात एवढी झपाटयाने वाढ? एवढा पांढरा फ़टफ़टीत? याला काही झालं-बिलं नाही ना? अरे हा काही बोलत पण नाही, नुसतेच तोंड हलवतोय. आइंग! असे कसे? आमच्या कानाचा काही प्रोब्लेम तर नक्कीच नव्हता. हो, अगदी खात्री होती. मग असे का? बोल की रे......
त्याला हात लावायला पण भीती वाटत होती. तो सवयीप्रमाणे पायाला घासायला जवळ वगैरे यायला लागला. पण भीतीने मी मागे जात होते. तो मग विचारात पडल्यासारखे बघत उभा राहिलेला.

त्यानंतर आम्हाला जाणवले, अरे खरचं आपला टुटु मोठा झालाय. रोज नजरेसमोर असल्या कारणाने ते आम्हाला कळत नव्हते. ८-१५ दिवस त्या पिल्लांना बघत होतो. त्या पिल्लांना बघताना बालपणीचा टुटु डोळ्यासमोर येत होता. टुटुचे त्यावेळेचे रुप काही दिवसांसाठी विसरुन गेलेलो. आणि त्या तुलनेत टुटु अचानक प्रचंड वाटायला लागलेला. पांढरा दिसण्याचे कारण पण ती पिल्लं होती. गावच्या मातीचा रंग चढलेला होता त्यांच्यावर. आणि आवाजाचे असे झाले की टुटुचा आवाज खरंच फ़ुटत नव्हता. इतके दिवस कोणी बोलायला नव्हते ना त्याच्याशी. गप्प राहुन राहुन त्याचा आवाज अगदी बंदच झालेला. टुटु बिच्चारा आमच्या नसण्याने त्याला खरंच काय काय सहन करावे लागले होते असेल.

माझ्या अनुभवाप्रमाणे, मांजरी बोक्यापेक्षा जास्त माणसाळलेल्या आणि कमी अग्रेसिव्ह असतात. आणि टुटु मांजरींपेक्षा अधिक समजुतदार आणि शांत स्वभावाचा होता. तो जस-जसा मोठा होत गेला, तस-तसा तो दिवसेंदिवस अधिकाधिक केविलवाणा, मृदु  वाटत होता. इतकेच कशाला, त्यावेळेला मला वाटते माझी भाची साधारण वर्षभराची होती असेल. ती येता-जाता त्याच्या खोड्या काढत असायची. कधी त्याचे कान धरुन चाव-माव करायची. कधी शेपटी ओढायची तर कधी केस उपटायची. पण बोका असुन पण त्याने ते सर्व सहन करायचा. अगदीच त्याला जेव्हा सहन नाही व्हायचे तेव्हा तो आपला मऊ पंजा अलगद तिला मारायचा. असं वाटायचे, तो म्हणतोय ’अट्ट लब्बाल’. जणु काही त्याला तेवढी जाण होती की ती लहान आहे. खरंच असा बोका ’न भूतो, न भविष्यति’

एक अनुभव इथे खास share करावासा वाटतो. माझे डिप्लोमाचे शेवटचे वर्ष होते. Final Exams चालु झालेल्या. घरात फ़क्त दादा-वहिनी आणि मीच. तेव्हा माझी भाची नव्हती म्हणजे माझी भाची जन्मायची होती. बाकीचे सर्व गावी गेले होते. त्याच दरम्यान वहिनीच्या माहेराहुन सर्व जण त्यांच्या गृह-प्रवेशासाठी गावाला जाणार होते. वहिनीच्या घरातले सर्वच जण जाणार असल्याने तिला पण सहाजिकच जायची ओढ वाटु लागलेली. त्यातुन ती आमच्या परिवारात सामील होऊन वर्ष पण झाले नव्हते. गावी जायला तिचा जीव झुरत होता. एक्झाम्समुळे मी गावी जाण्याचा काही प्रश्नच नव्हता. पण मला एकटीला सोडुन जाणे पण पटत नव्हते. शेवटी मग एक पर्याय सुचला. ’दिपू’ माझी वर्गमैत्रीण, तिला सोबत रहायला बोलवायचे. तशी ती पण कधीतरी आमच्याकडे रहायला यायची. झाले प्रश्नच सुटला. मग दादा-वहिनी निर्धास्तपणे गावाला जाऊ शकले.
एक-दोन दिवस ठिक गेले. दिपू होतीच सोबत. आमचा शेवटचा पेपर राहिलेला. तोपर्यंत मध्ये सात दिवसाची सुट्टी होती.
झाले. गावाला जायला दिपू नेहमी संधी शोधत असायची. तिचे आई-बाबा गावाला रहायचे ना. दोन-चार दिवस लागुन सुट्टी आली की ती लगेच गावाला जायची. सात दिवस सुट्टी आणि ती गावाला जाणार नाही, असे शक्यच नव्हते. तिने त्याबद्दल मला विचारले सुद्धा. मला एकटीने रहायची कल्पनापण सहन झाली नाही. याआधी कधी एकटी रहायचा कधी संबंधच आला नव्हता. पण तिला 'नाही' सांगणे पण मला ठिक वाटले नाही. तसे म्हटलं तर दोन-तीन दिवसाचाच प्रश्न होता. त्यानंतर गावावरुन दादा-वहिनी वगैरे येणारच होते. शिवाय तसे बघायला गेलं तर अगदीच एकटी नव्हते मी. माझा हिरो होता ना सोबत - टुटु

पहिल्यांदा मी ’Home - Alone’ चा अनुभव घेणार होते. खरं सांगायचे तर मला पण मजा वाटत होती, असे काहीतरी Thrill वगैरे वाटत होते. घरात फ़क्त आपलंच राज्य. पाहिजे तेव्हा, पाहिजे ते करायचे. काहीही खा-प्या. कोणी अडवणार नाही. त्यात वरुन सगळ्यांची सहानुभुतीपण. सहीच सगळं. असो.
बाकी काही प्रोब्लेम नव्हता. पण रात्री फ़ार भीती वाटायची. बारा वाजेपर्यंत झोपच नाही यायची. आणि त्यानंतर तर भुत-लोकांचा Office-Time सुरु होतो ना.

’Home - Alone : रात्र पहिली’

 बारा वाजुन गेले तरी साहेबाचा पत्ता नव्हता. नाईलाजाने खिडकीचे एक तावदाण जरा ओपन करुन ठेवले. ’चक-चक’ असा आवाज केला की तो कुठे असेल तेथुन धावत यायचा. मग खिडकीतुनच त्याला आवाज दिला. पण तो काही आला नाही. मग मनात विचार आला असेच डोळे मिटुन पडुन राहुया. तो आला की मग झोपायच्या आधी खिडकीचे तावदाण आठवणीने ओढुन घेऊ. मग अचानक जाग आली. अरे बापरे! घड्याळात पहाते तर एक वाजुन गेलेला. उठुन आधी खिडकीकडे पाहिले. तर खिडकी वार्‍याने वाटते बंद झालेली. खिडकीच्या पुसट काचेपलीकडे टुटुची आक्रुती दिसत होती. बिचारा खिडकी ओपन व्हायची वाटच पहात होता. कधीपासुन तेथे होता देव जाणे. लगेचच उठुन आधी त्याला आत घेतले. टुटु कधीही घरात आला की आधी जाऊन पाणी प्यायचा. त्याच्यासाठी एक भांडे भरुन ठेवलेलेच असायचे. तसा तो पाणी पिऊन माझ्या अंथरुणात माझ्या सोबतच येऊन झोपला. जाग आली तेव्हा चार-साडे चार होऊन गेलेले. ती वेळ बघुन जीवात जीव आला माझ्या. आई सांगते, चार नंतर राम-प्रहर सुरु होतो. भीती मावळली. माझी सर्व कामे सहा - साडे सहाच्या आतच आवरत होती. ८ ते ९ पाण्याची वेळ. बाकीची कामे पण विशेष नसायची. एकटीच असल्याने जेवणात 'full adjustment' - ब्रेड, बटाट्याची भाजी आणि चहा. अभ्यास करुया म्हटलं तर उरलेला पेपर सोप्पा होता. म्हणुन अभ्यासाला हात घालायला कंटाळा येत होता. माझ्या काळजीपोटी गावावरुन दोन-तीनवेळा फ़ोन यायचा . घर आणि दिवस खायला येत होते. पण तरीही टुटु सोबत असल्याने एवढे विशेष वाटत नव्हते. त्याच्या सोबत मी बडबड करायची. त्याला ओरडायची. तो बिच्चारा माझे सर्व ऐकत दिवसभर माझ्या मागे फ़िरत रहायचा.

’Home - Alone : रात्र दुसरी’

या रात्री पण बराच वेळ टुटुची वाट बघितली. एक वाजून गेला. आदल्या रात्री प्रमाणे खिडकीचे एक तावदाण ओपन ठेऊन मी डोळे मिटुन पडुन राहिले. पण कधी गाढ झोप लागली कळालेच नाही. साधारण दोन-अडीच वाजले असतील. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यायला लागला. मांजराच्या ओरडण्याचा आवाज पण येत होता. मी खडबडुन जागी झाले. सर्वात आधी टुटु घरात आला की नाही, ते पाहिले. कुत्रे बिल्डिंगमध्ये घुसल्यासारखे वाटत होते. भीती वाटली, ते कुत्रे टुटुच्याच मागे लागले असणार. मी एक दांडा (पोलिसांचा असतो ना तोच) हातात घेतला आणि कसलाही विचार न करता, सरळ बाहेर आले. त्या कुत्र्यांना हाकलवुन लावले. पण त्या कुत्र्यांना हाकलवता-हाकलवता  टुटुपण पळाला तेथुन. समोरच्या बिल्डिंगच्या मागे गेला. ’Oh, no! damate...’ म्हणत त्याच्या मागोमाग मी जायच्या विचारातच होते की मी भानावर आले. मध्यरात्र....त्यात मी एकटीच बाहेर....आजुबाजुला कोणी नाही. तडक घरात गेले. पण टुटुला परत बघितल्याशिवाय मला चैन पडणे शक्य नव्हते. पुन्हा खिडकीत येऊन टुटुला आवाज दिला. २-३ मिनिटे झाली तरी हा भाई कुठे दिसेना. मग धाकधुक वाढायला लागली. देवाचा धावा करत होते, त्याला सुखरुप आण असा. आणि समोरच्या बिल्डिंमागून एक पांढरा गोळा कान मागे करुन जोरात धावत येताना दिसला. तोच होता. धावतच खिडकीत चढला. धापा टाकत मागे बघत होता. माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. तो सुखरुप घरी आलेला. तो त्या रात्री कुशीत येऊन झोपला. सकाळी जाग आली, तेव्हा लक्षात आले की रात्री दाराला कडी लावायची विसरुन गेलेले. पण रात्रीच्या थरारापुढे हे विशेष नव्हते. हा प्रसंग आज पण आठवला, तरी कमाल वाटते.

नंतरच्या दोन रात्री सामान्य गेल्या. टुटु वेळेत घरी आलेला.

मांजरांबद्दल एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. हा प्राणी कडाक्याच्या थंडीत तुमच्या अंथरुणात वगैरे जरी शिरत असला, तरी उन्हाळ्यात तो तुमच्या अंथरुणाकडे ढुंकुनही बघणार नाही. पण टुटुची कमाल वाटते कारण 'Home - Alone' च्या वेळेला कडक उन्हाळा चालू होता. ज्या मांजर प्राण्याला उन्हाळ्यात आपली उब सहन होत नाही, तो चार रात्री कुशीत झोपत होता. हि खरोखरीच कमाल नाही का? त्याच्यामुळे खरंच त्या चार रात्री मला विशेष अशी भीती वाटलीच नाही.

गावावरुन आल्यावर घरातल्यांना हा प्रसंग सांगितला. ’खय गे होती माझी बाय ती’ करत माझे शोलीट कौतुक-बिवतुक झाले. घरातल्यांसाठी जरी मी हिरोईन वगैरे झालेले. पण माझ्यासाठी मात्र ’तो’च 'Man of the Match'होता.

त्या प्रसंगाबद्दल आई आजपण टुटुला मानते.  तिच्या मते, चार दिवसांसाठी तो माझा पाठी-राखाच बनलेला होता. ती त्याच्यासाठी या अर्थाचा मालवणीतला एक कोणता तरी शब्द पण वापरायची. सध्या तो तिला पण आठवत नाही आहे. पण खरच खूप गोड शब्द आहे. आठवला की नक्की  कळवेन.  

खर्‍या अर्थाने त्याने मला दिवस-रात्र सोबत केलेली. त्याच्या सोबतच्या त्या चार रात्री आणि ते चार दिवस खरंच अफ़लातुन होते.

Tuesday, November 30, 2010

भुर-भुर

रडु नको शोना, आई कुठे नाही जाणार...
बाळाला आई आज, भुर-भुर नेणार...

उंच उंच डोंगराच्या, टोकावर जाऊ
काळ्या-पांढर्‍या ढगांना, रंग थोडे लावु
रंगीबेरंगी ढग मग, मस्त मस्त दिसणार...
बाळाला आई आज, भुर-भुर नेणार...

ढगांना घेऊन सोबत, जाऊ जरा पुढे
पाहु मग सन-बाप्पा अन मुन-मामाचे वाडे
त्या दोघांसोबत दोघे आपण, तुप-रोटी खाणार...
बाळाला आई आज, भुर-भुर नेणार...

चिऊ-काऊला घेऊन मांडू, भातुकलीचा डाव
भुभु-माऊच्या सोबत, खेळु चाव-माव
मी चोर तु पोलीस, ढिश्शुम-ढिश्शुम करणार...
बाळाला आई आज, भुर-भुर नेणार...

खुदकन हसे बाळ, जरा विसरेल जेव्हा
जाईल कामावर आई, फ़सवुन तेव्हा
कामामध्ये जीव आता, कसा-बसा लागणार...
बाळाला आई आता, कुठे नाही नेणार...

लवकर-लवकर धावत-पळत, येईन तुझ्यासाठी
रुसुन तू कोपर्‍यात, घेऊन बस काठी
बघुन मात्र मला ’उच्चून घे’ सांगणार...
उराशी बाळाला घट्ट कवटाळुन घेणार... 

जाऊ आता चौपाटीवर, तु चने-शेंगदाणे घ्यायचे
मी आपटेन हात-पाय, मला आईस्क्रीमच पाहीजे
खोटे-खोटे रागवशील तू, मी खोटे-खोटे रडणार
आईला बाळ मग गुदु-गुदु करणार...
हसता-हसता आईचे डोळे भरुन येणार...

Monday, November 22, 2010

क्या कहूं


क्या कहूं जान...
जिसे देखो तुम्हारे ही खयालों में डुबा हुआ है...
मेरा क्या है, मैं तो जी रहा हुं जुदा होकर
धडकने तो बस नाम की हैं, दिल तो कब का मरा हुआ हैं...

चलो कोई बात नही
सुना हैं, मरने के बाद ही सही
सुकुन तो मिल ही जायेगा...
घाव पुरा भरे न भरे उपर से तो सील जायेगा...

सभी कहने लगे हैं पीठपीछे
के बदल सा गया हुं...
हा मगर सच हैं तेरी दुनिया से दूर
अलग से रहने लगा हुं ...

राहे भी मोड रख्खी हैं गलीयो से तेरी ...
नजरे छुपा के चलता हुं नजरो से तेरी ...

डरता हुं कही तेरे नजरोसे टकरा न जाऊ...
मौत का डर नही, सोचता हुं कही फिरसे जिंदा न हो जाउ...

Friday, November 19, 2010

टुटु


सुरुवात कशी करू, समजत नाही. आज अचानक एक लेख वाचनात आला आणि त्याची उणीव तीव्रतेने जाणवू लागली. तसे पाहता, त्याची आणि माझी जेव्हा ताटातूट झाली; मला खूप त्रास झाला, वाटले मी याला कधीच विसरू शकणार नाही. पण आपण आपल्या व्यापात एवढे गुंतून जातो कि कधी काळी आपला 'जीव कि प्राण' जरी असला तरी त्याचासुद्धा विसर पडू शकतो.

बाबांनी त्याला घरात घेतलेलं. त्यांना मुळात प्राण्यांबद्दल एवढी ओढ वगैरे नाही. एवढंच काय तर इतरांना प्राण्यांविषयी (त्यात मनुष्यप्राणी सुद्धा मोडतो) असलेल्या प्रेमाबद्दल पण त्यांना ते थोडे 'अति' करतात असे वाटते. तसे ते प्रेमळ आहेत पण ते व्यक्त करण्याबाबत त्यांचे विचार काहीसे जुन्या पद्धतीचे आहेत.

मी त्यावेळेला डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला होते मला वाटतं, नीटसं नाही आठवत. आम्ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत जायच्या तयारीत होतो. आमच्या वरळी 'ल' - विभागाचा राजा. दुपारी दीड- दोनच्या सुमाराला साधारणपणे आमचा गणपती बाहेर पडायचा.

दाराबाहेरून कसलातरी 'चीव-चीव' अगदी केविलवाणा असा आवाज आला. आवाज 'चीव-चीव' जरी असला तरी चिमणीचा नक्कीच नव्हता.
दार उघडून पाहिले तर उंबर्याला अगदी चिकटून उभे राहिलेले एक soft toy च जणू . शेपटी काटकोनात उभी आणि कदाचित कुठल्या स्कूटर किवा गाडीच्या खालून आला असेल कि काय म्हणून नाकाला काही काळे लागलेले. नंतर कळाले त्याचे नाकच तसे होते. पाठीवर आणि पायावर काही ठिकाणी मोठे काळे  डाग होते. शेपटी पण काळी होती.  बाकी ते अगदी शुभ्र, अगदी आताच धुतल्यासारखे .

बाबांनी बघितले आणि ते म्हणाले," ह्येका काय तरी घालो गो, केव्हद्ह्यान इफळाकता. भुकेला असत."
माझ्या बाहुलीला म्हणजे बहिणीला आणि मला हा सर्व प्रकार गमतीदार वाटला. आम्ही दोघींनी आईकडून एका बशीत दुध आणले. बिच्चारे खरच भुकेलेले होते, लगेच बशी चाटून-पुसून साफ पण झाली. मग ते कोपर्यातल्या शेजार्यांच्या दाराबाहेर एकच बूट ठेवलेला होता, त्यात जाऊन बसले. आणि लगेच झोपले पण.
दोन दिवस असाच उपक्रम चालला होता. कधी आम्ही त्याला गरमा-गरम चपातीचे तुकडे घालत होतो तर कधी दुध. ती बशी आईने त्याच्याच साठी ठेवून दिली. ती वेगळी गोष्ट होती की, त्या मांजराने तोंड लावलेलं भांडं आई परत घरात वापरायला घेणार नव्हती.

तिसर्‍या दिवशी, रात्री १२.०० किवा १.०० च्या सुमाराला दाराबाहेर कुत्र्यांची आरडा-ओरड ऐकायला आली. बाबांना लगेच जाणवले. ते काठी घेऊनच बाहेर गेले. ४-५ कुत्री त्या पिल्लासाठी बिल्डींगमध्ये शिरलेली. सगळ्यांना हाकलवून लावले बाबांनी. म्हणून पिल्लू बिच्चारे वाचले.  आठवड्यापूर्वीच या पिल्लाचा एक भाऊ या कुत्र्यांनी गायब केलेला. मग बाबाच त्याला घरात ठेवण्याबद्दल म्हणाले. पिल्लाचा जीव वगैरे सर्व ठीक आहे, पण पिल्लू घरात म्हणजे. मला किळस वाटली. मला प्राणी आवडत नाही अशातला भाग नाही, पण ते घराबाहेरच ठीक वाटतात.

आम्ही गावीपण कधीच्या काळी जायचो ना, तेव्हापण ह्या मांजरांमुळे मी वैतागलेली असायची. घरात नाही म्हटले तरी ४-५ मांजरे सहज दिसायची. घरात कुठे पण बघावे तिथे आपले एक तरी मांजर असायचे. बरे लांबूनच जातील तर ते पण नाही, पायाला घासायला यायची. आई काठीने त्यांना हाकलवून लावायची आणि मग मी कडी-कुलुपात जेवायला बसायची. पण निदान गावी घर मोठे असल्याकारणाने पळायला तरी वाव असतो. आणि इथे तर बापरे ! मला कल्पना पण सहन होत नव्हती.

तेव्हाच बाबांना सांगितले, ते घरात आलेलं मला चालणार नाही. बाबा मला अगदी 'बाबा-पुता' करून समजावत होते. सकाळी जाऊदे ते बाहेर पण आता घरातच असू दे. "किचन मध्ये ठेवूया, थयच झोपत बिच्चारा...बाहेर तेका कुत्री नाय करून टाकती."
बाबांनी शब्द दिला मांजराच्या वतीने कि तो रात्रभर त्या खोलीतून कुठेही हलणार नाही. बाहुलीने लगेच एक shoe -box आणला, त्यात एक कापड घडी करून ठेवले. आणि तो box एका पाटावर ठेवला. आश्चर्य म्हणजे ते पिल्लू लगेच त्यात जाऊन बसले. त्या बुटापेक्षा हे जरा प्रशस्त वाटलं असेल त्याला. तसेहि त्याचा आकार त्या बुटात पण सहज मावत होता. इल्लू-पिल्लूसं होतं अगदी. मग बाबांनी त्या box वर झाकण सरकवले माझ्या सांगण्यावरून. ते मलाच अति वाटले. म्हटले थोडं ओपन ठेवा एका बाजूने. मग मी निर्धास्त होऊन बाहेरच्या खोलीत झोपली. पण थोड्या वेळात एक कहरच झाला.

मी अर्ध्या झोपेत असेन, त्यावेळेला. मला चादर घेऊन झोपायची सवय होती, माझ्या पायावर काहीतरी जड-जड गरम-गरम काही आहे असे जाणवले. मला आठवले लगेच, हेच कार्टे असेल. डोक्यावरून चादर न काढताच मी किंचाळत होते. बाबा उठले आणि आधी त्याला परत आत ठेऊन आले. मी उठूनच बसले. त्या धाकधुकीत मला काही झोप येणे शक्य नव्हते. माझी झोपच उडाली. त्यापेक्षा पण मला बाबांबद्दल आश्चर्य वाटत होते, परकी का झालेले मी त्यांच्यासाठी? आज ते दीड-दमडीचे पण नसलेले मांजर त्यांना लेकीपेक्षा जवळचे वाटत होते. रात्रभर मला हेच विचार येत होते आणि त्याहून अधिक त्या मांजराचा राग येत होता.

नंतर नंतर दिवसा मला खूप सेफ वाटायचे, निदान कळायचे ते कुठे आहे; रात्री मात्र सतत धाकधूक असायची ते त्या box मधून बाहेर तर नाही ना आले असे.

असो, घरातले वातावरण मात्र पूर्ण बदललेलं. नवीन बाळ घरात आल्यासारखे वाटत होते. सर्वजण त्याच्याशी बोबड्या भाषेत बोलायचे. सगळ्यांनाच कुतूहल होते की तो boy  आहे की girl आहे, अगदी शेजार्‍याना पण उस्तुकता होती या बद्दल. मग मध्येच त्यांना शोध लागायचा तो बोका आहे, अगदी काळ-वेळचे भान न ठेवता त्या आम्हाला सांगायला यायच्या. दोन-तीन दिवसांनी त्याच सांगत यायच्या,''नाय हो सरवणकरांनु, भाटी असतली." शेवटी तो बोकाच आहे यावर शिक्कामोर्तब झाले, ते एक-दोन expert च्या सांगण्यावरून. Expert ने निष्कर्ष काढला, तो त्याच्या मागे बोके (जे त्यांना confirm माहिती आहेत) लागतात त्याला मारायला त्यावरून.  कितीही पुढारलेल्या विचारांचे असलो, तरी तो बोका आहे हे समजल्यावर घरात मुलगा जन्मल्यावर काय आनंद होतो; तो आम्हाला झाला.
त्याचे नामकरण मी आणि बाहुलीने केले - टुटु. सुरुवातीला फक्त आम्ही दोघीच या नावाने हाक मारायचो. मग हळू-हळू इतरांच्या तोंडीपण ऐकायला यायला लागले. कधी कधी तर त्या नावाचे 'टुट्या-फुट्या ' पण व्हायचे. आज त्याने नवीन काय केले, रोजच चर्चा चालायच्या. त्याच्या बर्‍याचश्या गोष्टी खूप cute वाटायच्या. जसे की लहान वस्तूंबरोबर फुटबॉल खेळणे, धागा किवा दोर्‍याबरोबर शिकार-शिकार खेळणे, जरा पिशवीचा किवा कागदाचा आवाज झाला की खाऊसाठी म्याव-म्याव करून घर डोक्यावर घेणे. त्याची समजूत काढताना घरातले लहान होत होते, 'अरे हो बाबा, घे बाबा'. पण त्याच्या काही काही खोड्या माझ्या डोक्यात जायच्या. जसे की एखादा कागद किवा news पापर त्याच्या तावडीत मिळाला की तो उंदीर होऊन जायचा, त्या वस्तूंचा अगदी भुगा होऊन जायचा. आपण बर्‍याचदा खुचीत बसलो की पाय हलवायची सवय असते. टुटु मग पायाबरोबर शिकार-शिकार खेळायला यायचा.  तो आजू-बाजूला असला की मी खुर्चीवर मांडी घालून बसायचे. खाताना त्याचे नखरेच जास्त असायचे. बिस्कीट, फरसाण, lays ते पण american flavour वाले, चपाती ती पण गरम असेल तरच. बरे या सर्वात एक नियम त्याचा त्यानेच ठरवलेला, शेवटचे एक - दोन घास टाकून चालू पडायचे. मग आई म्हणायची त्याला,"हय ये, तुझ्या गळ्यात बांधतंय." त्याला काही फरक पडत नसला तरी आईच्या ह्या वाक्याला मला हसायला यायचे. मला डोळ्यासमोर ते चित्र दिसायचे, की ते शांतपणे मला चूक कबूल आहे अशा आविर्भावात आईच्या समोर मान खाली खालून उभे आहे आणि आई त्या टाकलेल्या तुकड्यांची माळ गुंफतेय.
असो, पण या नियमाला अपवाद मात्र होता तो मच्छीचा. त्याच्या समोर टाकलेली मच्छी तो अगदी गळ्यापर्यंत आली तरी खात होता.

आम्ही तळमजल्याला रहात होतो. टुटुला अजून खिडकीतून ये-जा करायला जमत नव्हती, मग दार थोडा वेळ उघडे ठेवायला लागे. तो जास्त वेळ बाहेर रहात नसे, शरीर-धर्म उरकला की लगेच धावत घरात येत असे. चुकून कधी दार बंद असले की दाराबाहेर तोंड वर करून वाट बघत बसायचे बिच्चारे. बोका असला तरी उन्दरापेक्षा जास्त घाबरट होता. एकदा तर चक्क एक घूस त्याच्या मागे लागली होती आणि हा जीव मुठीत घेऊन पळत घरी आला होता. जरा म्हणून त्याच्यात dashig पणा नव्हता.

तो बाहेर गेला की परत येऊ नये, अशी माझी मनोमन इच्छा असायची. एकदा तर मी चक्क त्याच्या समोर news paper ठेवला. टुटुला सवय होती समोर काही अंथरले की जाऊन बसायचे. तसा तो बसला सुद्धा. त्या बिच्चार्याला काय ठाऊक माझ्या मनात काय शिजतंय ते. मी त्या पेपरासकट त्याला उचलले आणि खिडकीबाहेर फेकून दिले. दाराबाहेर बर्राच वेळ ते म्याव-म्याव करत राहिले, मी दार खोललेच नाही. पण थोड्यावेळाने कोणीतरी दार खोलले असेल आणि हे राजे परत घरात वावरताना दिसायला लागले.

तशी आता मला त्याची सवय झाली होती म्हणा. पण अजून ते मला नकोच होते.

एक दिवस त्याला काहीतरी झाले. रोजच्या सारखाच टुटु खेळत होता आणि अचानक तो जोर-जोराने कर्कश्श ओरडायला लागला. त्याचे पुढचे दोन पाय वर उचलून उभा रहात होता. आधी आम्हाला वाटले, हि काहीतरी नवीन गम्मत असेल. पण अचानक तो जमिनीवर लोळण घेत होता. अगदी मध्येच जमिनीला चिकटत होता. मग शब्दही फुटत नव्हता त्याच्या तोंडातून. मग हालचालही बंद होत होती. खाल्लेले उलटून काढत होता. काय होत होते त्याला कळत नव्हते. सगळेच टेन्शन मध्ये आलेलो. अगदी मी पण. असे त्याचे हाल पहावत नव्हते. ३-४ दिवस झाले, तरी त्याची तब्येत सुधारत नव्हती. दुधाच्या थेंबाला तर स्पर्शच करत नव्हता. बाबा तर सारखे म्हणायचे, "चाक झाली त्येका", देवाला गार्हाणे पण झाले. पण काही फरक पडत नव्हता. घरात कोणी माणूस आजारी असल्यासारखे वाटत होते.
आता मात्र एकच इलाज होता. बाबांनी त्याला सरळ कापडी पिशवीत भरले आणि घेऊन गेले डॉक्टरांकडे. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे, पथ्य-पाणी आई -बाबा स्वतः एखाद्या लहान बाळाचे करतात तसे करत होते. औषधाच्या गोळ्यांची पावडर करून ती पिठात घालून गोळी बनवायचे मग अक्षरशः त्याला पायावर पालथे घेऊन एकाने त्याचे हात पाय पकडायचे, आणि दुसर्‍याने तोंडात एक बोट घालून औषध आणि पाणी भरवायचे. ते चित्र बघून अगदी रडायला यायचे.  देवाला सांगायची, टुटु आम्हाला हवा आहे. त्याला लवकर बरे कर. आई - बाबांच्या प्रयत्नांना यश दे. असे ३-४ दिवस उलटून गेले, पण टुटु मध्ये सुधारणा नव्हती. आता आता तर तो खोक्या बाहेर पण पडत नव्हता. रात्री किचनचे दार बंद करायची गरज पडत नव्हती. त्याचे ते खेळ, म्याव-म्याव करून घर डोक्यावर घेणे, सगळ्यांचे बोबड्या भाषेत बोलणे - सगळं-सगळं बंद. आता आम्ही आशा सोडून दिली.

आणि अचानक रात्री, मी अर्ध्या झोपेत होते. माझी झोप पुन्हा उडाली. मला माझ्या पायावर काहीतरी जड-जड, गरम-गरम जाणवले. आणि तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. टुटु त्या ३-४ दिवसांनंतर प्रथमच खोक्याबाहेर पडलेला. मी बाबांना उठवून सांगितले. तो शांत झोपला होता माझ्या पायावर. माझी भीती अद्याप चेपली गेली नव्हती. पण त्याला तिथून हलवू दिले नाही. अजून हिम्मत असती तर त्याला उचलून कुरवाळले असते. पण खरच आई-बाबांच्या कष्टाचे चीज झालेले. आणि त्याचे नाव सार्थक झालेले, टुटुला दुसरा जन्म मिळालेला.

Tuesday, November 16, 2010

तू काही बोललास का ???

तू काही बोललास का 
कि मलाच भास होताहेत....
बघ ना असच होतंय
तू बोलत नाहीस  तेव्हापासून

 
तुझी गोड हाक...
नाहीतर नुसतच ....ए ऐक ना...
कान नुसतेच आसुसलेत शब्दन शब्द झेलायला....
बघ ना असच होतंय
तू बोलत नाहीस तेव्हापासून

 
तू दिलेला मोगरा बघ कसा कोमेजून गेलाय
चांदण्यांचे चेहरे उतरून गेलेत....
उदास रातराणी....पाहवत नाही रे तिच्याकडे
बघ ना असच होतंय 
तू बोलत नाहीस तेव्हापासून

 
मोबाईल.....
पाहिजे त्यावेळी प्रिय जणांशी संवाद साधता येतो....
पाहिजे त्यावेळी??? 
फेकून द्यावासा वाटतो मग.....
बघ ना असच होतंय 
तू बोलत नाहीस तेव्हापासून

 
खिडकी मध्ये किती येरा-झाऱ्या झाल्या असतील.....
कितीदा उगीचच दार उघडून बघितले असेन.....
वाटतं.....तु पाहतोयस माझी बेचैनी...आणि कळतंय तुलाही....
बघ ना असच होतंय
तू बोलत नाहीस तेव्हापासून

 
काय करायचं रे मी अशा क्षणाला???
तुझी नितांत गरज आहे....तुझ्या मिठीत विसरून जायचय जगाला....
बोल ना....तुझा अबोला जीव घेतो माझा....
अं.......काही बोललास का???
नाही मला भासच होताहेत......

कातरवेळ

अशा कातरल्या वेळी, तुझी आठवण येई 
एका मागोमाग एक, ऊर भरून का जाई...

तुझ्या आठवणी किती, ऊर जड मन जड
झाली घागर पालथी, पाणी पाहे घडा-घड...

जाते वाहुनिया पाणी, परी रिकामी न होई
येते कोठुनी हे पाणी, कशी भरुनीच राही...

पाट पाण्याचा पाण्याचा, वाहे मनाच्या मळ्यात 
व्याकुळले एक झाड, उभे त्याच्या ओहोळात 

वेड्या आठवांचे झाड, कसे जगले जगले 
कधी किलबिलाट सारा, कधी एकले एकले...

जीर्ण झाड ते केवढे, परी रंग तो कोवळा 
उंच उंच गेले वर, हात टेकते आभाळा...

निळ्या सावळया आभाळी, तू च तू च भरशील
डोळ्यातून आत आत, देहभर फिरशील...

अरे पुरे तो प्रवास, नको एवढा दमूस
खरोखर भेट कधी, नको सावली धाडूस...

जाई विरून सावली, बघ आल्यावर रात 
मग पाझरेण मीही, खोलवर काळजात...

तुला होतात का कधी, माझ्या सावलीचे भास 
माझ्या सारखेच तुझे, होतात का जड श्वास...

तुला तुझे व्याप भारी, कशी मीही आठवेन
काही वावगे न त्यात, कशी मीही रागवेन...

दिवे लागणीची वेळ, घर आवराया हवे
'हे' येतील च आता , मना सावराया हवे...

तुही निघ आता, माझी कामे रेंगाळली
तू होशील नाहीसा, मीही होते  इकडली...

घेतल्या का संगे  तुझ्या ,तुझ्या  सर्व  खाणाखुणा
अशा कातरल्या वेळी, भेटू सवडीने पुन्हा...

नको वळून पाहूस, नको पाहू दीनवाणे
वळू नको मागे आता, जा निघून वेगाने...

तुला सांगताना असे, माझा जीव असा जाई
अशी कातरली वेळ, मन कातरून जाई...

माझ्या बाळाची शाळा...

चला चला उठा बाळा,
बाळ माझा उठतो ना...
लवकर लवकर आवरा आता,
आपल्याला शाळेत जायचं ना...

आई थांब गं जरा,
उठतो मी...
आंघोळ पण करतो मी...
पण आज नाही शाळेत जाणार मी...

अरे राजा, पम-पम मधून जाऊ आपण,
पाय तुझे दुखतील ना....
दप्तर -बॉटल आई घेईल,
बाळ माझा थकतो ना...

आई पम-पम मधून फिरेन मी...
बाहेरचं मम-मम खाईन मी...
पण आज नाही शाळेत जाणार मी...

अरे बापरे, पाऊसपण आला,
बाळ माझा भिजेल ना...
छानसा रेनकोट घेईल आई,
मग गोड गोड दिसेल ना...

हो गं आई, रेनकोट घालून जाईन मी...
छत्रीपण सोबत घेईन मी...
पण प्लीज आई, आज नाही ना शाळेत जाणार मी...

अले...शाळेत नाही गेलास, तर हुशार कसा होणार,
सगळे तुला हसतील ना...
आईला तुझ्या अडाणी म्हणतील,
मग तुला चालेल ना...

नाही गं आई.....असं कसं होऊ देईन मी...
खूप-खूप शिकेन मी....
शिकून मोठा होईन मी....
जगासमोर तुझे नाव, उंचच उंच ठेवेन मी...

कोणी रे शिकवले हे सारे,
किती छान बोलतो ना...
काजळ-बोट लावू दे रे,
माझीच नजर लागेल ना...

Internet : एक व्यसन...

आजपण दिवसाची सुरवात,
रोजच्यासारखीच झाली...
सहकार्यांना Good Morning बोलण्याआधी,
Login- घाई केली...

चार -पाच Unread Message पाहून,
हायसे थोडं वाटलं...
इकडच्या तिकडच्या जाहिराती होत्या,
तिथच मन खुटलं...

Chat Room मध्ये कोणी दिसतंय का,
टाकली जरा नजर...
माझ्याशिवाय कोणीच नव्हते,
मीच फक्त हजर...

आठवलं मग Orkut,
म्हटलं कट्ट्यावर मारू फेरी...
Scrap नाहीतर Testimonial ,
कोणी भेटेलच कि तिथे तरी...

Community चा मान म्हणून,
थोडं तिथं पण डोकाऊ...
नवीन Forum ना सही,
पण रिप्लाय-बिप्लाय देऊ...

Server झाला Down,
आणि Connection गुल्ल झालं...
आता काही सुचणार नाही,
डोकं भनभनायला लागलं...

एकवेळ फोन नसला चालेल,
पण Internet मात्र हवे...
मित्रांसोबत काम करायचे,
हे सूत्र नवे...

तितक्यात आलं कोणीतरी,
चौकोन प्रकट झाला...
अजून एक हिरवा टिंब पाहून,
थोडा जीवात जीव आला...

Good Morning आणि How r u,
अशीच असते सुरवात...
मी मजेत रे, बाकी बोल विशेष,
गाडी धावते मग सुरात...

जेवणाच्या वेळेपर्यंत मग,
कोणीच बोलत नसते...
डब्यात काय आहे आज?
आवर्जून विचारणा असते...

आज सकाळपासून Desktop वर,
तुझं दिसणं कमीच होतं...
खूपच काम होतं वाटतं,
Schedule Busy होतं...

दमायला झाले आज तर
Boss ने डोके फिरवले यार ...
चालायचंच ... Boss शेवटी
Tension नको घेउस फार...

कधी चौकशी, कधी समजावणे,
कधी फक्तच गप्पा चालतात...
कधी सल्ले, कधी भांडणे,
कधी अक्षरशः एक-मेकांना झेलतात...

चला निघा आता दिवस संपला,
आठवण करण्यात येते...
रोजच्या सारखीच आजची पण
अशीच सांगता होते...

एक वेडा प्रयत्न...त्रिवेणी

आठवतं तुला .....काही चांदण्या तू माझ्या नावावर केलेल्यास???
बरेच दिवस झाले .....दिसल्या नाहित आकाशात....
.
.
.
फसवलं जाण्याचे दुःख सुद्धा भयानक असते, नाही का?....

***

तुझ्या उबेची सवय ....
नेहमीच तुझे गरम श्वास माझ्या श्वासात मिसळलेले...
.
.
.
हल्ली गारवा वाढलाय ...ना रे...

 ***

निरोप घेताना.... कधी तुझा रडवेला चेहरा तर कधी तुला न पडणारा फ़रक
दोन्ही माझ्यासाठी किती त्रासदायक
.
.
.
पहिला जीवाला हात घालतो आणि दुसरा जीवच घेतो

***